नगर शहर प्रतिनिधी / कुणाल चव्हाण : नशा केलेल्या पैलवानांना बादच व्हावं लागते अन् जे मातीचे पैलवान आहेत तेच कुस्ती जिंकत असल्याचा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना लगावला आहे. आज अहमदनगरमध्ये भाजप-शिंदे युती आणि जिल्हा तालीम संघाच्या संयुक्त विद्यामाने छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेतील अंतिम निकाली कुस्ती झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा समारोप झाला. यावेळी बोलताना फडणवीसांनी राजकीय विषयांवरही भाष्य केलंय.
फडणवीस म्हणाले, काही लोकं नशा करुन कुस्ती खेळायला लागल्याने त्यांना बाद केलं आहे. तसेच राजकारणातही काही जण नशा करुन रोज सकाळी कुस्ती खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, नशा केलेल्या पैलवानांना बादच व्हावं लागते जे मातीचे पैलवान आहेत तेच कुस्ती जिंकत असल्याचा टोला फडणवीसांनी संजय राऊतांना लगावला आहे.
तसेच कुस्ती हा आपला प्राचीन खेळ असून भीमसुद्धा कुस्ती खेळायचे. पहिल्यांदा कुस्तीला छत्रपती शिवरायांनी आणि त्यानंतर शाहु महाराजांनी बळ दिलं आहे. छत्रपती शाहु महाराजांनी चांदीच्या गदेची परंपरा सुरु केली होती. आता सोन्याच्या गदेची परंपरा सुरु झाली असल्याचं ते म्हणाले आहेत.
पैलवान खाशाबा जाधव यांनी पहिल्यांदा आपल्याला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून दिलं. नगरच्या याच मातीतून आपल्याला खाशाबा जाधव यांच्यासारखे मल्ल घडवायचे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच मुख्यमंत्री असताना आम्ही पैलवानांच्या मानधनात मोठी वाढ केली होती. 3 हजारांवरुन थेट 18 हजार रुपये मानधन दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
त्याचबरोबर महाराष्ट्र केसरी जिंकणाऱ्या पैलवानांना आम्ही डीवायएसपी अशा नोकऱ्याही देऊ केलेल्या आहेत. तुम्ही अहमदनगच्या स्टेडियमसाठी प्रस्ताव करा, मी त्याला मान्यता देतो, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं आहे. दरम्यान, जनतेच्या आशिर्वादाने आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात कुस्ती जिंकली आहे, यापुढील काळातील 2024 ची कुस्तीही जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.