दिशा शक्ती न्युज: प्रमोद डफळ / अहमदनगर, दि. 27 जुन – सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक न्याय देण्याची केंद्र शासनाच्या भूमिका असून सुगम्य भारत अभियानाच्या माध्यमातून विकासाची प्रक्रीया अधिक गतिमान करण्यासाठी केंद्र सरकार कटीबध्द असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
केंद्रीय आधिकारीता मंत्रालय आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तिंना साधन साहित्याचे मोफत वितरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, सहायक आयुक्त राधाकिसन देवडे, डॉ.अभिजित दिवटे, बाळासाहेब गायकवाड, श्रीकांत भालेराव, सुरेंद्र थोरात, प्रकाश लोंढे, पप्पू बनसोडे आदी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून सुगम्य भारत अभियान सुरु करण्यात आले आहे. यामध्ये आता 21 श्रेणी निर्माण करण्यात आल्या असून याद्वारे दिव्यांगांना न्याय मिळवून देताना देशातील 1 हजार 314 सरकारी भवन हे सुगम्य बनविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. 35 आंतरराष्ट्रीय विमानतळ, 709 रेल्वेस्टेशन, 614 संकेतस्थळ, 19 समाचार चॅनल तसेच 8 लाख शाळा यासर्व सुविधांनी परिपुर्ण करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
राज्यातही विभागामार्फत समाज घटकांच्या उन्नतीसाठी 2 लाख 44 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून आतापर्यंत राज्यातील 5 हजार 993 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी सहकार्य केले असल्याचे राज्यमंत्री श्री आठवले यांनी सांगितले.
राज्यातील जिल्हा पुर्नवसन केंद्र तसेच कौशल्य विकास योजनेकरीताही केंद्र सरकारने निधी उपलब्ध करुन दिला असून यु.डी.आय.ए योजनेच्या माध्यमातून 17 लाख दिव्यांग व्यक्तिंना कार्डचे वितरण करण्यात आले आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा हीच भूमिका केंद्र सरकारची आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी सातत्याने सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यांचे सक्षम नेतृत्व देशाला पुढे घेवून जात असून केंद्र सरकारच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक न्यायाचे काम होत आहे. भविष्यात दिव्यांगाच्या आरक्षणाच्या बाबतीतही सरकार संवेदनशिल असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, यापुर्वी जेष्ठ नागरीकांसाठी वयोश्री आणि आता दिव्यांग व्यक्तिंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली पालकत्वाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आजपर्यंत समाजातील या घटकांचा कोणीही विचार केला नव्हता. जिल्ह्यातही या योजनेची अंमलबजावणी प्राधान्याने केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून वंचितांना न्याय मिळवून देण्याचे काम होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात जिल्ह्यातील 720 दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक उपकरणांचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला लाभार्थी व्यक्ती, त्यांचे कुटुंबिय, परिसरातील नागरीक उपस्थित होते.