प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : मूल होत नसल्याने पतीचे पत्नीला जाळून मारल्याची घटना नुकतीच महाराष्ट्रात घडली. यातील आरोपी पतीस पोलिसांनी अटक केली आहे.कारमध्ये जळून पतीसमोर पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच तळणी-मंठा रोडवर घडली होती. पतीने दिलेली माहिती व घटना पहिल्यापासूनच संशयास्पद होती. दरम्यान, मृत विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविता सोळंके (३०) असे मृत विवाहितेचे तर अमोल सोळंके (काऱ्हाळा, ता. परतूर) असे आरोपी पतीचे नाव आहे.
तेरा वर्षांपासून मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून अमोल वेळोवेळी घटस्फोट दे, असे म्हणून पत्नीला शिवीगाळ व मारहाण करत होता. तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होता. अनेकदा त्याने पत्नीकडे घटस्फोट देण्याची मागणी केली. परंतु पत्नी घटस्फोट देण्यास नकार देत असल्याचा राग मनात धरून त्याने पत्नीला कारमध्ये जिवंत जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मृत विवाहितेचा भाऊ बळीराम जाधव (स्वामी विवेकानंद नगर, माजलगाव, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघे पती-पत्नी रात्री बारा वाजेच्या सुमारासच शेगाव येथून का निघाले, टेम्पोने कारला धडक दिली, तर कार डॅमेज का झाली नाही, कार जळत असताना पतीने काचा फोडून पत्नीला का वाचविले नाही, असे अनेक प्रश्न या घटनेतून उपस्थित होत होते. पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित आरोपीस पोलिस उपनिरीक्षक बलभीम राऊत यांनी आरोपीस परतूर तालुक्यातून ताब्यात घेतले.
Leave a reply