श्रीरामपुर तालुक्यातील ट्रक चालकाचा पश्चिम बंगालमध्ये जमावाच्या मारहाणीत मृत्यू
श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील ट्रक चालकाचा पश्चिम बंगालच्या खडकपूर येथे अपघाताच्या कारणावरुन जमावाकडून झालेल्या जबर मारहाणीत मुत्यू झाला आहे. तीन दिवसानंतर मृतदेह टाकळीभान येथे आणल्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावणात अंत्यसंस्कार पार पडले.
येथील गरीब कुटुंबातील शाम शंकर गणकवार (व 29) हा टाकळीभान येथून ट्रक क्रमांक (एम.एच 17 बी.झेड. 4582) मध्ये कांदा भरुन पश्चिम बंगाल येथील खडकपूर येथे जात असताना त्याच्या कडून अपघात झाला होता. मात्र, तो घटनास्थळावरुन गाडी सोढून पळून न जाता अपघातातील जखमी झालेल्यांना मानवतेच्या भावनेने मदत करत होता. मात्र, अपघातस्थळी जमा झालेल्या जमावाकडून त्याला जबर मारहाण झाली. जमावाच्या जबरी मारामुळे त्याचा जागेवरच मुत्यू झाला. त्याला वाचवण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही जमावाकडून मारहाण झाल्याने सुमारे दहा पोलिस कर्मचारीही जखमी झाले.
गाडीला ठोकायचे आणि पळून जायचे असे प्रकार नेहमी होत असतात. पण आता हे प्रकार चालणार नाहीत. हिट अँड रन केसमध्ये आता कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केले आहे. त्यात अपघात करून फरार होणार्यांवर कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. अपघात घडल्यानंतर वाहनचालकानेच तात्काळ पोलिसांना त्याची माहिती देणं बंधनकारक आहे. पोलिसांना अपघाताची माहिती न देता पळून गेल्यास कमीत कमी 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, नियमाचे पालन करत असताना टाकळीभान येथील शाम याला जीव गमवावा लागला. त्याच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले आहेत.