विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर परिसरातील वीज वितरणाचे केंद्र असलेल्या टाकळी ढोकेश्वर येथिल सबस्टेशनमध्ये एका महत्त्वाच्या अधिकाऱ्याची खुर्ची मागील काही वर्षांपासून रिकामी आहे. खासदार निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी व परिसरातील गावकऱ्यांनी अनेक वेळा याप्रकरणी महावितरणला निवेदनेही देण्यात आली आहेत. मात्र कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. अधिकारी नसल्यामुळे बिलाचे वाद, ट्रान्सफॉर्मर बदलणे, वीज खंडित झाल्यानंतर दुरुस्ती काम, वीज मिटरशी संबंधित तक्रारी आदी प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांना अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. काहीवेळा नागरिकांना पारनेरच्या कार्यालयात धाव घ्यावी लागते.
अधिकारी नसल्याने स्थानिक कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी येत आहे. निर्णय घेणारा वरिष्ठ अधिकारी नसल्यामुळे तांत्रिक कामे, मंजुरी प्रस्ताव पाठवणे यासाठी वेळ लागत आहे. परिणामी, सेवा प्रभावीपणे पोहचत नाही. गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक ग्रामपंचायत व सामाजिक कार्यकर्ते या विषयावर आवाज उठवत आहेत. काही ठिकाणी निवेदने देण्यात आली आहेत. संबंधित प्रशासनाने या प्रश्नी लक्ष घालून तत्परतेने कारवाई करावी अशी मागणी खासदार निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी व स्थानिक नागरिकांनी केली आहे.
टाकळी ढोकेश्वर सबस्टेशन अंतर्गत जवळपास १८ गावे येतात. यामध्ये गावठानासाठी ३ फिडर आहेत. त्यामध्ये टाकळी ढोकेश्वर सबस्टेशन अंतर्गत वासुंदे,ढोकी, धोत्रे, काकणेवाडी, वडगाव सावताळ, कर्जुले हार्या,निवडुंगेवाडी अशी नऊ गावे, खडकवाडी अंतर्गत वनकुटे, पळशी,नागापूरवाडी व परिसरातील गावे, तर पळसपूर अंतर्गत पोखरी, काटाळवेढे, गुरेवाडी व परिसरातील गावे येतात. शेतीसाठी अंदाजे माहितीनुसार ७ फिडर आहेत. त्यामुळे एकूण १० ते ११ फिडर कार्यरत असून प्रभारीराजमुळे १८ गावांचा कारभार वाऱ्यावर आहे.
टाकळीढोकेश्वर महावितरण कार्यालयाला अभियंता द्या – बाळासाहेब खिलारी, टाकळीढोकेश्वर सबस्टेशन अंतर्गत १८ गावांचा कारभार वाऱ्यावर

0Share