Disha Shakti

इतर

अंमलदारांना तात्काळ कार्यमुक्त करा; टाळाटाळ केल्यास प्रभारी अधिकाऱ्यांवर कारवाई – पोलीस अधीक्षक घार्गे यांचा इशारा

Spread the love

अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : प्रशासकीय बदल्यांनंतरही काही पोलीस अंमलदारांना कार्यमुक्त न केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सोमवारी (23 जून) कडक भूमिका घेतली. त्यांनी स्पष्ट आदेश दिले की, सर्व संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांनी आजच कार्यमुक्ती प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा संबंधितांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

प्रत्येक अंमलदाराची पाच वर्षांची मुदत पूर्ण झाल्यानंतर प्रशासकीय बदल्या नियमितपणे जाहीर होतात. पोलीस अधीक्षकांच्या बदल्या दरबारात अंमलदारांच्या पसंतीचा विचार होतो. तरीही काही प्रभारी अधिकारी आपल्या पसंतीच्या अंमलदारांना जुन्या ठिकाणी थांबवण्यासाठी कार्यमुक्त करत नाहीत. यामुळे पोलीस दलात नाराजीचा सूर आणि उलटसुलट चर्चा रंगत आहेत.

याआधी अनेकदा — 29 एप्रिल 2023, 30 जून 2023, 21 जुलै 2024, 29 मे 2025 व 4 जून 2025 रोजी — कार्यमुक्तीचे आदेश जारी झाले. मात्र अद्याप काही अंमलदार नव्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत. त्यामुळेच सोमवारी पुन्हा आदेश काढून अधीक्षक घार्गे यांनी कार्यमुक्ती प्रक्रियेवर भर दिला आहे.

“सन 2023 पासून बदल्या जाहीर झालेल्या अंमलदारांना अद्याप कार्यमुक्त न करणे हे शासनाच्या नियमांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे अशा सर्व अंमलदारांना तात्काळ कार्यमुक्त करून कारवाईचा अहवाल सादर करावा. कार्यमुक्ती टाळणाऱ्या प्रभारी अधिकाऱ्यांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरले जाईल आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल,” असे घार्गे यांनी आदेशात नमूद केले आहे.

बदल्या अंमलदारांची कार्यमुक्ती होत नसल्यामुळे प्रशासकीय उद्दिष्टे कुंठीत होत असून, शिस्त आणि नियमानुशासन धोक्यात येत आहे. अधीक्षक घार्गे यांनी घेतलेली ही कठोर भूमिका जिल्हा पोलीस दलात शिस्त प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

“पोलीस अंमलदारांना बदली ठिकाणी तात्काळ कार्यमुक्त करावे. कार्यमुक्ती टाळणाऱ्या प्रभारी अधिकाऱ्यांवर नक्कीच कारवाई होईल. दोन ते तीन दिवसांत सर्व अंमलदारांना कार्यमुक्त केले जाईल.”

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे

अधिकाऱ्यांना कार्यमुक्ती कधी?

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी परिक्षेत्रात बदल्या केल्या आहेत. जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांनी निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्या बदल्या जाहीर केल्या. तरीही काही अधिकारी जुन्या ठिकाणीच कार्यरत आहेत. काही बदल्यांना वर्ष उलटून गेले असूनही कार्यमुक्ती झालेली नाही. त्यामुळे “कार्यवाह कधी?” असा प्रश्न पोलीस दलात उपस्थित होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!