राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील गोटुंबे आखाडा परिसरातील अनेक पथदिवे गेल्या आठ दिवसांपासून दिवस-रात्र सतत सुरू असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारातील निष्काळजीपणा समोर आला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वीज अपव्यय होत आहे तसेच काही पथदिवे कायमस्वरूपी बंद पडल्यामुळे परिसर अंधारात बुडाला आहे.
सद्या राहुरी खुर्दचे ग्रामविकास अधिकारी प्रभाकर चव्हाण यांना पितृशोक झाल्याने ते रजेवर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत ग्रामपंचायत प्रशासनाचा बेजबाबदार कारभार उघड झाला आहे. परिसरातील नागरिकांनी अनेकदा पथदिव्यांच्या दुरुस्तीची मागणी ग्रामपंचायतीकडे केली असून 26 जानेवारीच्या ग्रामसभेतही हा विषय मांडण्यात आला होता. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
सद्याच्या काळात राहुरी तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले असताना रस्त्यांवर अंधार असल्याने चोरट्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, दिवसा पथदिवे चालू राहिल्यामुळे वीज बचतीचा संदेश देखील फोल ठरत आहे.
ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तातडीने पथदिव्यांची देखभाल-दुरुस्ती करून योग्य नियोजन करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून वीज अपव्यय थांबेल आणि रात्रीच्या वेळी नागरिकांना आवश्यक प्रकाश मिळेल.
राहुरी खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील गोटुंबे आखाडा परिसरात पथदिवे दिवस-रात्र सुरू, अनेक पथदिवे पडले बंद ग्रामपंचायतचा निष्काळजीपणा समोर

0Share