दिशाशक्ती राहुरी : माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज एक आगळावेगळा उपक्रम राबवत राहुरी तालुक्यातील चाळीस शेतकऱ्यांसह एसटीने प्रवास करत श्रीरामपूर येथे झालेल्या ए आय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानावर आधारित कार्यशाळेत सहभाग नोंदवला. त्यांच्या या साध्या, लोकाभिमुख उपक्रमाची सध्या नगर जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे बारामती आणि श्रीरामपूर येथील संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ए आय तंत्रज्ञान व ऊस उत्पादन वाढीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत देशभरातील तज्ञांनी शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा ऊस शेतीत कसा उपयोग करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील प्रसाद शुगर या खाजगी साखर कारखान्याशी संलग्न शेतकऱ्यांनी कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाकडे मागणी केली होती. ही मागणी मान्य करत व्यवस्थापनाने एसटी बसची व्यवस्था केली. यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी शेतकऱ्यांसोबत राहुरी ते श्रीरामपूर असा प्रवास करत आपल्या साधेपणाचा आणि शेतकऱ्यांप्रती असलेल्या आपुलकीचा प्रत्यय दिला.
प्रवासादरम्यान आणि कार्यशाळेत त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे शेतकऱ्यांसाठी ए आय तंत्रज्ञानाचे महत्त्व, याचा भविष्यातील शेतीतील उपयोग आणि सरकारच्या धोरणांशी याचे नाते स्पष्ट केले.केंद्र सरकारने यंदाचे वर्ष ए आय तंत्रज्ञान वर्ष म्हणून जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर अशा कार्यशाळांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. माजी मंत्री तनपुरे यांचा हा शेतकऱ्यांसह एसटी प्रवास आणि तंत्रज्ञान जनजागृतीचा उपक्रम जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.
ए आय तंत्रज्ञान कार्यशाळेसाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा शेतकऱ्यांसह एसटीने प्रवास

0Share