जिल्हा प्रतिनिधी (प्रमोद डफळ) दि.22 ऑगस्ट , अहमदनगर– भारतीय संरक्षण दलाच्या पुणे येथील भरती कार्यालयाचे वतीने अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ मध्ये येत्या 23 ऑगस्ट 2022 ते 11 सप्टेंबर 2022 या कालावधीत अग्नीवर भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी अग्नीवीर जनरल ड्युटी, अग्निवीर तांत्रिक, स्टोअर कीपर, टेक्निकल आणि अग्नीवीर ट्रेडसमन या पदाकरीता उमेदवारांची नोंदणी केली असून उमेदवारांना प्रवेश पत्र देण्यात आली आहेत. या भरती मेळाव्यासाठी तरुणांमध्ये उत्साह आहे. या भरती मेळाव्यासाठी अहमदनगरचे जिल्हा प्रशासन आणि स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांनी पूर्ण सहकार्य केले आहे. उमेदवारांच्या भरती प्रक्रियेसाठी व्यावसायिक पद्धतीने पायाभूत सुविधा आणि एकूण मांडणी केली आहे. उमेदवारांसाठी जेवण, पिण्याचे पाणी आणि विश्रांतीची सोय देखील करण्यात आली आहे. भरती मेळावासाठी दररोज 5 हजार उमेदवारांना बोलावण्यात आले आहे.
यामध्ये धावणे, शारीरिक तंदुरुस्ती चाचण्या, शारीरिक मोजमाप चाचण्या आणि वैद्यकीय चाचण्यांचा समावेश असेल राहुरी येथे वैद्यकीय तपासणीसाठी लष्कराच्या डॉक्टरांचे पथक देखील तैनात करण्यात आले आहे. मेळाव्याच्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना सर्व संबंधित कागदपत्रे सोबत ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशी माहिती भारतीय संरक्षण दलाचे पुणे येथील जनसंपर्क अधिकारी महेश अय्यंगार यांनी त्यांच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.