दिशाशक्ती राहुरी / जावेद शेख (१२ एप्रील) : सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ राहुरी येथे रमजान ईद साजरी करून सणाचे महत्व सांगण्यात आले. सर्व धर्म समभाव राष्ट्रीय एकात्मता हे मूल्य रुजवावेत म्हणून सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयांमध्ये रमजान ईद हा सण साजरा करण्यात आला प्राचार्य अरुण तुपविहिरे यांच्या संकल्पनेतून व संस्थेचे सचिव डॉ महानंदजी माने साहेब यांच्या प्रेरणेने हा उपक्रम घेण्यात आला.
विज्ञान शिक्षक हलीम शेख यांनी रमजान ईद साजरी करण्यामागील हेतू तसेच या सणाचे आध्यात्मिक व वैज्ञानिक महत्त्व स्पष्ट केले. उपवास करताना स्वतःला वाईटकृती, विचारापासून दूर ठेवणे व आपल्या पंचेंद्रियांवरवर नियंत्रण मिळवणे तसेच काम ,क्रोध. मोह मत्सर या दुर्गुणांपासून मुक्ती मिळवण्या बरोबरच आपल्या शरीराची निगा राखणे हे रोजा (उपवास )करण्याचे खरे कारण होय.
याप्रसंगी प्रा.जितेंद्र मेटकर म्हणाले की भारतातील विविध जात धर्म, पंथ, भाषा, भूषा, आहार,विहार, प्रांत यातील एकात्मता आणि एकसूत्रता हीच खरी भारताची ओळख आहे. या प्रत्येक धर्माच्या प्रत्येक क्षणातून दिला जाणारा मानवतेचा संदेश आपण आपल्या आयुष्यात अंगीकारला तर खऱ्या अर्थाने भारताची बहुसंस्कृतिकता टिकून राहील आणि आपण आपल्या देशाला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाऊ शकू. आपल्या जीवनातील भौतिक सुख साधनांच्या प्रगती सोबतच ही मानवी नीती मूल्यांची प्रगती होणे हे अत्यंत गरजेचे आहे असेही सांगितले.
या प्रसंगी रोजांचे उपवास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला. प्राचार्य अरुण तुपविहीरे यांनी सर्व विद्यार्थ्याना या पवित्र सणाच्या शुभेच्छा देऊन या मागचा उद्देश स्पष्ट केला. ज्याप्रमाणे विद्यालयात आपण नैसर्गिक रंग तयार करून रंगपंचमी, होळी, रक्षाबंधन असे सण साजरे करतो अगदी त्याचप्रमाणे आज पवित्र रमजान ईद चा सण साजरा करीत आहोत. विदयालय हे सर्व मानवतेची मूल्य रुजविणारे आणि वाढविणारे संस्कार केंद्र असते आणि याच पार्श्वभूमीवर शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये सर्वधर्म समभाव,राष्ट्रीय एकात्मता आणि हम सब एक है, या गोष्टी रुजवाव्यात या उद्देशाने विद्यालयाने हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमाबद्दल कृषी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू तसेच सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत कुमार पाटील, सभापती डॉ. प्रमोद रसाळ तसेच सचिव डॉ.महानंद माने, खजिनदार महेश घाडगे , सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाच्या सर्व संचालकांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे उपप्राचार्य बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा, क्रीडाशिक्षक घनश्याम सानप, संतोष जाधव, तुकाराम जाधव, अनिस सय्यद तसेच सर्व शिक्षकांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.
सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता या मूल्याची शिकवण शालेय स्तरापासूनच रुजवणे आवश्यक : प्राचार्य अरूण तुपविहीरे

0Share
Leave a reply