Disha Shakti

इतर

नगर जिल्ह्याला आज यलो अलर्ट, अवकाळीच्या हजेरीसह वादळ : उष्णतेसोबत आता उकाडाही वाढला

Spread the love

अ.नगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून ठिकाण बदलून अवकाळी पावसासह वादळाचा तडाखा बसत आहे. यामुळे अनेक तालुक्यात पशुधनासह मनुष्यहानी आणि घरांच्या नुकसानीसोबत पाणी टंचाईत कशाबशा वाचलेल्या फळबागांना फटका बसतांना दिसत आहे. गुरूवारी जिल्ह्याच्या काही भागात अवकाळीने पुन्हा हजेरी लावली असून वादळ झालेले आहे. दरम्यान, आज शुक्रवारी (दि.17) भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका कमी झाला असला तरी उष्णता आणि उकाडा वाढला आहे. यामुळे नागरिक हैराण झालेले दिसत आहे. गुरूवारी नगरच्या एमआयडीसीसह नगर तालुक्यातील काही भागात जोरदार अवकाळीच्या सरी कोसळ्या. काही ठिकाणी दमदार पाऊस बरसला असून या पावसानंतर उकाड्यात कमालीची वाढ झाली होती. 25 मे पासून पावसाच्या रोहिणी नक्षत्र सुरू होत असून या काळात पडणार्‍या पावसाला नगर जिल्ह्यात वळवाचा पाऊस म्हणून संबोधण्यात येते. हा पाऊस झाल्यास जिल्ह्यातील दक्षिण भागात कडधान्य पिके जोमात येत असल्याचे जुने जाणकार सांगतात.

मात्र, वळवाचा पाऊस झाल्यास जिल्ह्यात पावसाळ्यातील दोन पावसात अंतर वाढून त्याचा खरीप हंगामावर परिणाम झाल्याचा अनुभव आहे. जिल्ह्यात सात जूनला सुर्याचा मृग नक्षत्र प्रवेश होणार आहे. मृग नक्षत्रात पाऊस झाल्यास पिके जोमदार येत असल्याचा अनुभव आहे. दरम्यान, या अवकाळीनंतर नगरसह राज्यात उन्हाचा चटका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!