Disha Shakti

Uncategorized

शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून अधिकाऱ्यांनी अधिक लोकाभिमुख कामे करावीत शासन आपल्या दारी उपक्रम गाव-गावात राबवा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

Spread the love

दिशा शक्ती न्युज : प्रमोद डफळ / अहमदनगर, दि.01 जुलै-शासन सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेकविध लोकोपयोगी योजना राबवते. याचा लाभ तळागाळातील प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून अधिकाऱ्यांनी अधिक लोकाभिमुख कामे करावीत. तसेच शासन आपल्या दारी उपक्रम गावा-गावात राबविण्यात यावा, अश्या सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या. सहकार भवन येथे अहमदनगर तालुकास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, जिल्हा मध्यवर्ती जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदी उपस्थित होते.


पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जलजीवन मिशन योजना संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी आपल्या जिल्ह्याला ४ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ज्या गावात कामे सुरू आहेत त्या प्रत्येक गावास अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट द्यावी. कामांमध्ये असलेल्या अडचणी व त्रुटी गावकऱ्यांशी संवाद साधून दूर कराव्यात व याबाबतचा अहवाल १५ जुलैपर्यंत सादर करावा. कामाच्या ठिकाणी प्रत्येक गावात नागरिकांच्या माहितीसाठी योजनांची माहिती असलेले फलक बसविण्यात यावेत. तसेच ज्या गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी रस्त्याच्या मधून पाईपलाईन टाकल्याने रस्ते खराब झाले असतील ते रस्ते तातडीने दुरुस्त करून घेण्यात यावेत. योजनेअंतर्गतची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील याची काळजी घेण्याचे निर्देश पालकमंत्री श्री विखे-पाटील यांनी यावेळी दिले.


जिल्ह्यातील जनतेला योग्य दाबाने व अखंडितपणे विजेचा पुरवठा होण्यासाठी शासनामार्फत विद्युत विकासावरही भर देण्यात येत आहे. ज्या भागात उच्च दाबामुळे रोहित्रावर ताण येऊन वीज वितरणामध्ये अडचणी निर्माण होत आहेत अशा ठिकाणची माहिती संकलित करून प्रस्ताव सादर करण्यात यावा. नवीन रोहित्रांसाठीच्या उभारणीसाठी आवश्यक निधी देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. विजेची वाढती मागणी लक्षात घेता सौरऊर्जा निर्मितीवर भर देण्यात येत आहे. शासकीय जमिनी तसेच खासगी जमिनीवर प्रकल्प उभारणीसाठी जमीन मालकाला मोबदला देण्यात येत आहे. जिल्ह्याच्या विजेच्या मागणीमधील किमान ४ हजार मेगावॅटची गरज भागेल यादृष्टीने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांनी दिल्या.


जमीन मोजणीसंदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी येत होत्या. जमीन मोजणी वेळेत होऊन नागरिकांना नकाशे मिळावेत यासाठी शासनाने रोव्हर तंत्रज्ञानाचा वापर करून मोजणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या तंत्रज्ञानाचा वापर करत मोजणीही करण्यात येत असून जिल्ह्यात मोजणीची प्रलंबित असलेली प्रकरणे येत्या महिनाभरात पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांनी मोजणीसाठी अर्ज केल्यास १५ दिवसांमध्ये मोजणी होऊन नागरिकांना ऑनलाईन नकाशे उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री विखे-पाटील यांनी यावेळी दिल्या.

सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणारे हे शासन आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून पाच लक्ष रुपयांपर्यंतचे मोफत उपचार देण्याचा निर्णय घेणारे देशातील एकमेव असे आपले राज्य आहे. शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांमध्ये पीकविमा देण्याचाही निर्णय शासनाने घेतला असून येत्या काळात पशुधनाला एक रुपयांमध्ये विमाकवच, गुंठेवारी, तुकडेबंदी तसेच शासकीय बांधकामांना वाळू ऐवजी क्रशसॅण्ड वापरण्याचा निर्णयही लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी दिली.
हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करत शेती व्यवस्था मजबूत करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. देशाची आर्थिक क्षमता वाढविण्यात शेतकऱ्यांचे मोठे योगदान. देशातील जनतेला मोफत धान्य वितरण केवळ शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्यामुळेच शक्य झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले म्हणाले, अहमदनगर तालुका हा दुग्धव्यवसाय करणारा तालुका आहे. पशुपालकांना व्यवस्थितपणे त्यांचा व्यवसाय करता यावा यासाठी वीज वितरण प्रणाली सुरळीत व्हावी. शेतीमध्ये जाणाऱ्या रस्त्यांचे प्रश्न आहेत ते तातडीने सोडविण्यात यावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पीकस्पर्धेत यशस्वी शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र तसेच शेतकऱ्यांना बियाण्यांचेही मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी शासन योजना अधिक गतीने व पारदर्शकपणे राबविण्याच्या सूचना केल्या.
सर्वप्रथम स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
बैठकीस सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी, गावातील सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!