Disha Shakti

इतर

मांडओहोळ धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, मित्र सोबत फिरायला गेले अन दुर्घटना घडली

Spread the love

जिल्हा प्रतिनिधी : वसंत रांधवण (अ.नगर) : अहमदनगर जिल्ह्यात प्रसिद्ध असणारे पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील मांडओहोळ धरणात पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना पाण्याची खोली लक्षात न आल्याने बुडून दोन तरुणांचा पाण्यात मृत्यू झाला आहे. अथर्व श्रीनिवास श्रीराम (वय १७), सौरभ नरेश मच्चा (वय १७, दोघेही रा. शिवाजीनगर, अहमदनगर) अशी मी मृतांची नावे आहेत.

पारनेर तालुक्यातील मांडओहोळ जलाशयात रविवारी (दि. १९) दुपारी दोन तरुण बुडाले. दोघांपैकी एकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले, तर दुसऱ्याचा शोध सायंकाळपर्यंत सुरू होता. आज सोमवार दि. २० मे रोजी सकाळी नऊ वाजता दुसरा मृतदेह सापडला आहे. अहमदनगर शहरातील कल्याण रस्ता परिसरातील शिवाजीनगर भागातील सहा मुले दुचाकीवरून मांडओहोळ जलाशयात गेले होते. अथर्व श्रीनिवास श्रीराम (वय १८, रा. शिवाजीनगर, नगर-कल्याण रस्ता, अहमदनगर) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याला पाण्याबाहेर काढण्यात यश आले. तथापि, सौरभ नरेश मच्छा (१८, रा. अहमदनगर) याला अद्याप पाण्याबाहेर काढण्यात यश आलेले नाही. त्याचा सायंकाळपर्यंत शोध सुरू होता.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रविवारी दुपारी चैतन्य बालाजी सापा (वय १९, शिवाजीनगर, अहमदनगर), आकाश अनिल हुंदाडे (१८), जीवन दिनेश पाटील (रा. रेल्वे स्टेशन, आगरकर मळा, अहमदनगर), अभिलाष रघुनाथ सुरम (१८) हे सहाजण दुचाकीवरून निघोज येथून मांडओहोळ जलाशयात पोहोचले.

दुपारी तीन ते चारच्या दरम्यान अथर्व श्रीराम, सौरभ मच्छा पाण्यात पोहोण्यासाठी उतरले. पोहत असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते पाण्यात बुडाले. त्यानंतर इतर मित्रांनी आरडाओरड केली. आजूबाजूचे लोक आले. तसेच ही माहिती समजल्यावर सरपंच प्रकाश गाजरे व त्यांचे सहकारी तेथे पोहोचले. त्यांनी अथर्व श्रीरामला पाण्यातून बाहेर काढले. त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सौरभ मच्छा हा पाण्यातच होता त्याचा शोध काल सायंकाळपर्यंत सुरू होता.
त्याचा शोध घेण्यासाठी नगर येथून त्यासाठी स्वतंत्र पथक देखील बोलवण्यात आले होते.

आज सोमवारी सकाळी नऊ वाजल्याच्या दरम्यान दुसरा मृतदेह सापडला आहे. पारनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी घटनास्थळी भेट दिली. दोन्ही मृतदेह टाकळीढोकेश्वर येथिल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन साठी दाखल करण्यात आले असून पंचनामा करून मृतदेह मृतांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!